Friday, June 2, 2023

श्री शिवराज्याभिषेक दिनी किल्ले सिंहगडावर पालखी सोहळा



श्री शिवराज्याभिषेक दिनी किल्ले सिंहगडावर पालखी सोहळा

विश्व हिंदू परिषद पुणे श्री शिवराज्याभिषेक अभिवादन समिती (किल्ले सिंहगड) तर्फे आयोजन 

पुणे : विश्व हिंदू परिषद, पुणे श्री शिवराज्याभिषेक अभिवादन समिती (किल्ले सिंहगड) च्या वतीने तिथीनुसार श्री शिवराज्याभिषेक दिन व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त किल्ले सिंहगड येथे भव्य अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

भारतीय इतिहासातील सुवर्णक्षण म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा. आनंदनाम संवत्सर ज्येष्ठ शु. त्रयोदशी नृपशालिवाहन शके १५९६ या दिवशी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला. त्या प्रसंगाचे मूक साक्षीदार म्हणजे स्वराज्यातील गड किल्ले होय. त्यामुळे श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन प्रत्येक गड किल्ल्यावर झाले पाहिजे. याउद््देशाने समितीने किल्ले सिंहगड येथे हा सोहळा आयोजित केला आहे. रविवार, दिनांक ४ जून रोजी सकाळी १० वाजता सिंहगडावर पालखी सोहळा व मिरवणूक काढण्यात येणार आहे, अशी माहिती विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्राचे मंत्री संजय मुरदाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला समितीचे अध्यक्ष किशोर चव्हाण, उपाध्यक्ष शरद जगताप, सचिव श्रीकांत चिल्लाळ, श्रीपाद रामदासी आदी उपस्थित होते.

किशोर चव्हाण म्हणाले, अभिवादन सोहळ्याचे यंदाचे हे सहावे वर्ष आहे. सोहळ्याचा प्रारंभ रविवारी सकाळी ८ वाजता छत्रपती राजाराम पूलाजवळील वीर बाजी पासलकर स्मारकपासून आयोजित विराट दुचाकी रॅलीने होणार आहे. विठ्ठलवाडी, हिंगणे, माणिकबाग, धायरी फाटा, किरकटवाडी, खडकवासला, डोणजे, सिंहगड पायथा या मार्गाने सिंहगडावरील वाहनतळ येथे रॅलीचा समारोप होईल. सोहळ्यामध्ये हजारो शिवभक्त सहभागी होणार आहेत.

ते पुढे म्हणाले, रविवारी सकाळी १० वाजता सिंहगडावरील वाहनतळापासून नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी व कार्यक्रम मैदानापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. पालखी मिरवणुकीत ढोल-ताशा पथक, शंखनाद पथक आदी सहभागी होणार आहेत. यावेळी महाराजांच्या मूर्तीस अभिषेक तसेच नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीचे पूजन देखील करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे वेदपठण देखील होणार आहे.

सोहळ्याकरता पाहणी करत असताना छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधी स्थळाची पडझड झालेली दिसली, त्यामुळे त्या स्थळाची दुरुस्ती किंवा पुर्नबांधणी करण्यात यावी, तसेच किल्ले सिंहगड येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तानाजी मालुसरे यांचे पूर्णाकृती पुतळे बसवले जावेत, अशी मागणी करत, समिती यासंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना कार्यक्रमस्थळी निवेदन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

समितीचे उपाध्यक्ष शरद जगताप म्हणाले, सोहळ्याला पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सरनोबत सरसेनापती येसाजी कंक यांचे थेट वंशज आकाश कंक, अनमोल कंक यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सिंहगडावरील मंदिरे व ऐतिहासिक ठिकाणांचे पूजन देखील यावेळी होणार आहे. त्याच प्रमाणे, पर्यावरण संवर्धन ही बाब लक्षात घेऊन रॅली दरम्यान सीड बॉम्ब चे रोपण करण्यात येणार आहे. पर्यटकांनी रविवारी सकाळी ८ ते दुपारी २ यावेळेत चारचाकी वाहने घेऊन येणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यंदाचे वर्ष हे श्री शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षाची सुरुवात असल्याने, समितीतर्फे इतिहास चिकित्सा, दुर्ग चिकित्सा, ऐतिहासिक व्यक्तिमत्वे, ऐतिहासिक ग्रंथ परिचय, शिवकालीन शस्त्रकला आदी बाबींचा समावेश असणारी, शिवशक ही स्मरणिका प्रकाशित होणार आहे. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे, अशी माहिती स्मरणिकेचे संपादक श्रीपाद रामदासी यांनी दिली.


Friday, December 3, 2021

सिंहगड रस्ता परिसरात संपन्न होणार रक्तदान महायज्ञ

 


एकाच दिवशी, एकाच वेळी ११ ठिकाणी रक्तदान शिबीर

भारतीय सैन्यातील हुतात्मा जवान आणि हुतात्मा कारसेवक कोठारी बंधू यांच्या स्मरणार्थ विश्व हिंदू परिषद सिंहगड भाग; भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करीत असते, या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. 

आपल्या शहराची रक्ताची गरज भागविण्यात हातभार लागावा, तसेच शक्य तितक्या गरजू रुग्णांचे प्राण वाचावेत यां करीताच हा रक्तदान रुपी सेवायज्ञ चेतवला जातो, म्हणूनच या उपक्रमाला  "रक्तदान महायज्ञ" असे नाव देण्यात आले आहे. 

या उपक्रमाची दखल घेत, पुणे शहरातील रक्तदान क्षेत्रात महत्वाची कामगिरी करणाऱ्या संस्था असा सन्मान, नाते रक्ताचे ट्रस्टच्या वतीने करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे गुरुवर्य अतुलशास्त्री भगरे यांनी देखील या उपक्रमाचे, जाहीर कौतुक केले आहे.

या महायज्ञाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे, हा उपक्रम राबवण्याकरता कोणतेही राजकीय पक्ष किंवा नेते, सामाजिक संस्था यांचे कडून रोख स्वरूपात, निधी घेतला जात नाही. 

या महायज्ञाचा सर्व खर्च संघटनेचे स्थानिक पदाधिकारी, हितचिंतक आणि कार्यकर्ते स्वयंप्रेरणेने स्वतःच करत असतात. 

त्याचप्रमाणे रक्तदात्यांना कोणत्याही प्रकारच्या गिफ्टचे आमिष दाखवले जात नाही, आणि म्हणूनच या उपक्रमामधे १०० हुन अधिक गणेश मंडळे, सेवा भावी संस्था, प्रतिष्ठाने, फाउंडेशन्स देखील सक्रिय पणे सहभागी होतात. 

तथापि ज्यांना कोणाला सहकार्य करायचे असेल ते व्यवस्था स्वरूपात करू शकतात. 

या उपक्रमाची प्रचार प्रसिद्धी, रक्तदान विषय उपदेशपर स्फुट लेख, काव्ये,  व्हिडीओद्वारे, सोशल मीडियातुन केली जाते.

प्रतिवर्षी विविध केंद्रांमधून केंद्रांमधून, विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, पोलीस अधिकारी, आमदार, खासदार, डॉक्टर, वकील, आय टी प्रोफेशनल्स यांसारखे विविध क्षेत्रातील मान्यवरांसह हजारो नागरिक उपस्थितीत रहातात. 

एका रक्ताच्या बाटलीतून किंवा पिशवीतून तीन रुग्णांचे प्राण वाचवता येतात, त्यामुळे आजपर्यंत या उपक्रमाद्वारे, सुमारे १५००० रुग्णांचे प्राण वाचवण्यात आले आहेत. हा समाजउपयोगी उपक्रम राबवणारे आयोजक हे समाजशील तरुणाई आहेत, आणि म्हणूनच सामाजिक बांधिलकी जपू पाहणाऱ्या प्रत्येक नागरिकाने या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन आयोजकांना उत्तेजन देणे गरजेचे आहे असे आम्हांस वाटते म्हणूनच हा लेखन प्रपंच.

यंदाच्या वर्षी, रवि. ०५ डिसेंबर २०२१ रोजी, एकाच दिवशी, एकाच वेळी ११ ठिकाणी रक्तदान महायज्ञ संपन्न होणार आहे. 

रक्तदान केंद्रांची माहिती मिळवण्याकरता,  येथे क्लिक करावे --> रक्तदान महायज्ञ २०२१ केंद्रांची यादी. 


द्वारा : माहिती रंजन समूह पुणे.

Tuesday, October 26, 2021

समरसता भाऊबीज.




विश्व हिंदू परिषद सिंहगड भागाच्या वतीने, समरसता भाऊबीज हा उपक्रम राबवण्यात येत आहे. 

या उपक्रमाद्वारे समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या भगिनींना फराळ बनवण्याचे साहित्य, पणत्या, आकाश कंदील, सुगंधी उटणे आदी पारंपरिक वस्तू भाऊबीजेची ओवाळणी म्हणून देणार आहेत. 

खरे तर दिवाळी म्हणजे हिंदूंचा सर्वात मोठा सण, या अश्या सणाला घरात फराळ बनवणे, पहाटे उठून अभ्यंग स्नान करणे आणि मंगलमय वातावरणात गृहलक्ष्मीने कष्टाने बनवलेल्या गोड तिखट फराळाचा एकत्रितपणे आस्वाद घेणे या सारखे समाधान दुसरे नाही. 

पण गेल्या १७-१८ महिन्याच्या कठीण काळामुळे, हॅन्ड टू माऊथ अशी परिस्थिती असणाऱ्या अनेकांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले आहे. 

जिथे आज मिळाले तर उद्या मिळेल का नाही याचीच भ्रांत होती किंवा काही प्रमाणात आजही आहे तिथे कुठला सण आणि कुठले समाधान. 

जेंव्हा कधी आपल्या कुटुंबातील सदस्यांवर संकट येते तेंव्हा आपण बाहेरच्या कोणाची वाट पाहतो का ? नाही ना ? 

कोटी कोटी हिंदू बंधू भगिनींच्या या कुटुंबातील विवंचना सोडवण्यासाठी कोणाची वाट का बघावी ? आपणच आपल्या बंधू भगिनींना सहकार्य केले पाहिजे. 

" यस्य नारियस्य पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवता " असे मनुस्मृतीत सांगितले आहे, त्यामुळे कधी सरस्वती, कधी अंबिका तर कधी दुर्गेच्या स्वरूपात आपण ज्या आपल्या माता भगिनींना पाहतो त्या भगिनींना भाऊबीज म्हणून काही ओवाळणी आपण देणार का नाही ?

विश्व हिंदू परिषद, सिंहगड भाग, नेहमीच " न हिंदू पतितो भवेत " या उक्तीस अनुसरून संकटात असणाऱ्या हिंदू बंधू-भगिनींना समाजाच्या सहभागातून सहकार्य करत असते. 

एका भाऊबीज किटची किंमत रु. ८००/- इतकी असून खालील खात्यावर पैसे पाठवून आपली सेवा आजच संपन्न करा. 

Acc Name : Vishva Hindu Parishad sinhgad Bhag

Bank Name : Janata Sah Bank, Hingane Br

Acc NO     : 037220100026214

IFSC         : JSBP0000037


खालील क्रमंकावर गुगल पे देखील करू शकता.

 Google Pay No : 9881833633 

 Name : Raju Kudale 

हा उपक्रम म्हणजे, " तुम्ही आम्ही सकल हिंदू, बंधू बंधू " या सावरकर वचनाची प्रचिती देणारा उपक्रम आहे असेच मला वाटते. 

तथापि आपणही अश्याच एखाद्या अनामिक भगिनीला ओवाळणी देण्यासाठी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन आम्ही करत आहोत.

रक्कम जमा केल्यावर पावतीची मागणी अवश्य करा. आपण पाठवलेल्या रकमेची अधिकृत पावती देण्यात येईल.

संपर्क : श्रीपाद श्रीकांत रामदासी [ +९१९६१९४९०५३४ ]


-- माहिती-रंजन समूह पुणे. 

टिप : सदर आवाहन हे केवळ प्रचारसेवा या भूमिकेतून करण्यात येत आहे. सदर आर्थिक व्यवहाराशी माहिती-रंजन समूह यांचा काहीही संबंध नाही.

Tuesday, October 19, 2021

भारतीय सेना ऍक्शन मोड मध्ये





काश्मीरमध्ये सध्या सुरु असलेल्या दहशतवादी कारवायांमुळे स्थानिक नागरिक तसेच काश्मीर बाहेरून 

आलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते आहे. 

भारतीय सेनेने जनतेला रक्षणाचा विश्वास देत दहशतवाद्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली असून,

फुटीरवाद्यांचे साहाय्य घेऊन कोणी दहशदवादी पळून जाऊ नये यासाठी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

पूंछ आणि राजौरी भागात हे ऑपरेशन चालू असून संपूर्ण भागाला सैन्याने घेरले असून, अखेरचा दहशदवादी संपल्याशिवाय हे ऑपरेशन थांबेल असे वाटत नाही. 

मागील आठ दिवसात ९ हुन अधीक सैनिक हुतात्मा झाले आहेत आणि त्यामुळे दहशत वाद्यांचा खातमा करण्यासाठी भारतीय सैन्य ऍक्शन मोड मध्ये आहे. 

माहिती रंजन समूह पुणेच्या वतीने, हुतात्मा सैनिकांना विनम्र श्रद्धांजली !

जय हिंद !


माहिती रंजन समूह पुणे

Thursday, September 16, 2021

गोष्ट भारताच्या अभियंत्याची [ सर एम. व्ही. ]

 



गोष्ट आहे इथली भारतातलीच जेव्हा इथं इंग्रजांचं राज्य होतं..

कुठल्यातरी लोहमार्गावर प्रवाश्यांनी खच्चून भरलेली रेल्वे चालली होती आणि प्रवाश्यात काही मोजक्या भारतीयांसोबत बरेचसे इंग्रज मंडळीही होते..

त्या रेल्वेच्या एका डब्यात साध्या पोशाखातला एक सावळासा शिडशिडीत तरुण प्रवासी शांतपणं खिडकीबाहेरचा निसर्ग न्याहाळत होता..

त्या तरुणाचं रंगरूप आणि कपडे बघून त्याला अडाणी समजणारे काही इंग्रज प्रवासी आपसात कुजबूज करत हसत होते..

‘आपल्यालाच हसतायेत’ हे ठाऊक असूनही तो साधा सावळा तरुण त्यांचाकडं लक्ष्य न देता आपल्याच विचारात दंग होता आणि हे बघून त्याच्याबद्दल कुजबूज करणारे जास्तच हसत होते..तेवढ्यात ‘त्या’ तरुणानं अचानक उभं रहात रेल्वेची साखळी खेचली..

एव्हाना रेल्वेनं वेग पकडला होता पण या तरुणानं साखळी ओढल्यानं रेल्वे अचानक थांबली..

हा आपली तक्रार करतो की काय?याला इथं उतरायचं तर नसेल?वेडा तर नाही? सहप्रवाश्यांच्या मनात एक ना अनेक शंका डोकावल्या..

काहींनी तर त्याला बावळट,मुर्ख म्हणत शिव्याही घातल्या..
तेवढ्यात डब्यात गार्ड आला आणि त्यानं अंमळ रागातच विचारलं,”कुणी आणि का साखळी खेचली रे ?”

साखळी खेचणारा साधासा तो तरुण पुढं आला ‘मी खेचली’ त्याचं हे उत्तर ऐकून गार्डनं त्याला खालून वर न्याहाळलं आणि काही बोलणार तोच तरुण पुढं सांगू लागला,”मला वाटतं इथून साधारण काही फर्लांग अंतरावर रेल्वेचा रूळ तुटलाय.”

“ॲंऽऽ तुला इथूनच कसं कळलं बुवा?” गार्ड अद्यापही रागातच होता..
“महोदय..गाडीच्या नैसर्गिक वेगात थोडा फरक पडलाय आणि रुळांतून येणारा आवाजही मला काहीसा बदलल्यासारखा वाटतोय..ही धोक्याची घंटा आहे..”

“अच्छा एवढी हुशारी?चल बघूनच घेऊ” म्हणत गार्ड त्या तरुणाला घेऊन डब्यातून खाली उतरला..

फर्लांगभर अंतरावर बघतो तर काय? एका ठिकाणी रुळाचा जोड खरोखरच निखळला होता आणि नटबोल्ट इतस्तत: पसरले होते.. हे सगळं बघून इतर प्रवाश्यांचे अन् विशेषत: इंग्रजांचे तर डोळे पांढरे झाले..

त्या साध्याश्या तरुणाच्या समजदारीमुळं मोठा अपघात टळला होता..लोकं त्याचं कौतूक करू लागले..
इंग्रजासोबतच गार्डलाही स्वत:ची क्षणभर लाज वाटली ‘आपलं नाव?’ त्यानं अदबीनचं तरुणाला विचारलं..

मी मोक्षगुंडम विश्वेशरैय्या..मी एक अभियंता आहे

त्याचं नाव ऐकून सगळेच क्षणभर स्तब्ध झाले कारण या नावानं तोपर्यंत देशभरात ख्याती मिळवली होती..

लोकं त्या तरुणाची माफी मागू लागले..”अरे पण तुम्ही माफी का मागताय?” विश्वेशरैय्यांनी हसत विचारलं..
“ते..आम्ही..तुमची जरा खिल्ली..”

“मला तर नाही बुवा काही आठवत” मंद स्मित करत विश्वेशरैय्यांनी सगळ्यांना लागलीच माफही करून टाकलं..

१८८३साली अभियांत्रिकी परिक्षा पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विश्वेश्वरैय्यांचं पहिलं प्रेम ‘स्थापत्य अभियांत्रिकी’ अर्थात सिव्हिल इंजिनिअरींग..

आपल्या करीयरच्या पहिल्या काही वर्षातच त्यांनी कोल्हापुर-बेळगाव-धारवाड-विजापूर-अहमदाबाद-पुणे इथं शहरांसाठी राबवल्या जाणाऱ्या पाणीपुरवठा योजनेत भरपूर काम केलं..

१९०९ साली त्यांची म्हैसुर राज्याचा मुख्य अभियंता म्हणून नियुक्ती झाली सोबतच रेल्वेचं सचिवपदही मिळालं..

तिथं ‘कृष्णराज सागर’ धरणनिर्मितीत त्यांच्या योगदानाबद्दल भरपूर चर्चा झाली कारण यामुळं प्रचंड मोठं क्षेत्र पाण्याखाली आलं होतं आणि वीजनिर्मितीसोबतच म्हैसुर-बंगलोर या शहरांना पाणीपुरवठाही झाला..

‘कृष्णराज सागर’ धरण विश्वेशरैय्यांच्या तांत्रिक कौशल्याचं अन् प्रशासकिय वकुबाचं प्रतिक ठरलं..

आता सोपं वाटत असेल पण त्याकाळी इतकी मोठाली धरणं बांधणं तांत्रिकदृष्ट्या प्रचंड अवघड होतं..
हायड्रोलिक इंजिनिअरींग तितकीशी विकसित नव्हती आणि सगळ्यात मोठं आव्हान तर सिमेंटचं होतं..
इतकं सिमेंट आणायचं कुठून? तेव्हा देश याबाबतीत संपुर्णपणे आयातीवर अवलंबून होता आणि थोडक्यात सांगायचं तर ऐपतही नव्हती..

जलाशयात पाणी नियंत्रित करण्यासाठी विश्वेशरैय्यांनी पुस्तकापलिकडं जात विशेष तांत्रिक प्रयोग केले..
त्यांनी धरणाच्या भिंतीजवळ विहिरीसदृश्य गोलाकार संरचना केली आणि त्यांना स्वयंचलित दरवाज्यांशी जोडलं आणि दरवाजे धरणाच्या भितींच्या आत बसवले..

यातल्या १७१ दरवाज्यांपैकी ४८ लोखंडी दरवाजे भद्रावतीच्या पोलाद कारखान्यात बनवले होते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या प्रत्येक दरवाज्यावर दहा टनांचा भार असूनही ते स्वत: वर खाली होऊ शकत होते..

जेव्हा जलाशयात पाण्याची पातळी वाढायची तेव्हा पाणी विहिरीत पडायचं ज्यामुळं विहिरीची पातळी वाढून स्वयंचलित दरवाजे आपोआप उघडून जायचे आणि अतिरिक्त पाणी निघून जायचं अन् विहिरीची पातळी जशी कमी व्हायची तसे दरवाजे आपोआप बंद होऊन पाण्याचा प्रवाह थांबत होता..

संपुर्ण जगभरात असं अभिनव तंत्र पहिल्यांदाच वापरलं जात होतं याची नंतर युरोपासह इतर अन्य देशात काॅपी झाली..

‘धरणाची उंची न वाढवता त्याची जलक्षमता वाढवणं’ ही कल्पना कुणाच्या स्वप्नात देखील आली नसेल पण
विश्वेशरैय्यांनी ते करून दाखवलं ते ही इथं पुण्यातल्या खडकवासल्यात..

‘मुठा’ नदीच्या पुराला नियंत्रित करण्यासाठी त्यांनी खडकवासला धरणावर पहिल्यांदाच स्वयंचलित दरवाज्यांचा प्रयोग केला होता..या प्रयोगाचं त्यांनी पेटंटही घेतलं होतं..

धरण निर्मितीसोबतच विश्वेश्वरैय्यांनी देशाच्या औद्योगिक विकासातही भरिव असं योगदान दिलं..
धरण आलं तशी वीज आली आणि जशी वीज आली तसे उद्योगधंदे बहरू लागले..

औद्योगिकीकरणाचे खंदे समर्थक असल्यानं त्यांनी बंगलोर इथं ‘भारतीय विज्ञान संस्थान’ या ठिकाणी धातुकाम विभाग-वैमानिकी-औद्योगिक दहन आणि अभियांत्रिकी अश्या अनेक विभागांची पायाभरणी केली..

औद्योगिकीकरणास त्यांचा फक्त ढोबळ पाठिंबा नव्हता यामागं देशांतर्गत अशिक्षितपणा-गरीबी-बेरोजगारी-अनारोग्य याबाबत मुलभूत असं चिंतन होतं..

उद्याेगधंद्यांचा अभाव-सिंचनासाठी मान्सूनवरची अवलंबिता-पारंपरिक कृषी पद्धती-प्रयोगांची कमतरता यामुळं विकासात येणारा अडथळा रोखण्यासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम करत आपल्या कार्यकाळात म्हैसूर राज्यातल्या शाळांची संख्या ४५००वरून १०,५०० पर्यंत नेली फलस्वरुप विद्यार्थ्यांची संख्या १,४०,००० वरून ३,६६,००० पर्यंत वाढली..

मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृहासोबतच पहिलं फर्स्ट ग्रेड काॅलेज सुरू करण्याचं श्रेयही त्यांचंच..
सोबत म्हैसूर विद्यापीठाच्या स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता..

हुशार मुलांना परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती,शेतकी-अभियांत्रिकी-औद्योगिक प्रशिक्षणासाठी महाविद्यालये यासाठी त्यांनी दुरगामी नियोजन केलं..

‘उद्योगंधदे म्हणजे देशाची जीवनरेखा’ असं मानत त्यांनी रेशम-चंदन-धातू-स्टिल अश्या उद्योगांना जर्मन आणि इटालियन तंत्रज्ञांच्या मदतीनं विकसित केलं..

त्यांची धडपड आणि आशावाद निव्वळ स्वप्नाळू होता असं नाही तर ‘फंड’ हे वास्तव ध्यानात घेऊन त्यांनी बॅंक ऑफ म्हैसूरची मुहूर्तमेढ रोवली..

तब्बल ४४वर्षे सक्रिय सेवा देऊन १९१८साली विश्वेश्वरैय्या लौकिकार्थानं निवृत्त झाले तरी त्यांनी समाजजीवनातलं आपलं काम सोडलं नाही किंबहुना अडीअडचणीला भारतीय अभियंत्यांना प्रशिक्षित करून अनेक बंद पडलेली कामं मार्गी लावली..

म्हैसूरमध्ये ऑटोमोबाईल आणि एअरक्राफ्ट फॅक्टरीचं स्वप्न बघत त्यांनी एचएएल आणि प्रिमिअर ऑटोमोबाईलचं बीज पेरलं आणि निवृत्तीनंतरही बख्खळ काम करून ठेवलं..

आपल्या आयुष्यात संख्य असंख्य बहुमानांनी सन्मानित झालेल्या त्यांना १९५५ साली वयाच्या ९५व्या वर्षी जेव्हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ जाहिर झाला तेव्हा त्यांनी तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरूंना एक पत्र लिहिलं,”मला या उपाधीनं सन्मानित केलं म्हणून मी तुमचं कौतूक करेल अशी अपेक्षा तुम्ही बाळगलीत तर तुमच्या पदरी निराशा पडेल..मी सत्यांच्या मुळाशी जाणारा माणुस आहे”

नेहरूंनी त्यांच्या या पत्राची प्रशंसा करत त्यांना “राष्ट्रिय घडामोडींवर बोलणं-शासकिय धोरणांवर टिका करण्याचं स्वातंत्र्य नेहमी अबाधित असेल..पुरस्कृत करणं म्हणजे शांत बसवणं नव्हे”असं उत्तर दिलं..

वयाची शंभरी उलटल्यानंतरही विश्वेशरैय्या कार्यमग्न राहिले आणि १४ एप्रिल १९६२ या दिवशी रुढार्थानं हे जग कायमचे सोडून गेले असले तरी इतिहासात त्यांचं नाव कायमचं कोरून गेलं..

विश्वेश्वरैय्या हे ना जन्मानं महान होते,ना त्यांना कुठला दैदिप्यमान वारसा होता,ना हे महात्म्य त्यांचावर कुणी थोपवलं होतं..
कठिण परिश्रम-ज्ञानपिपासु वृत्ती-अथक प्रयत्न-समाजाभिमुख वर्तन यामुळं त्यांना हे ‘महात्म्य’ प्राप्त झालं होतं..

प्रचंड बुद्धिमान अभियंता-तितकेच कुशल प्रशासक असणाऱ्या विश्वेशरैय्यांचा जन्मदिन त्यांच्या सन्मानार्थ  ‘अभियंता दिन’ म्हणून साजरा केला जातो. 

या ऋषितुल्य व्यक्तित्वाला विनम्र अभिवादन.....

-- व्हाट्स ऍप वरून साभार 
      माहिती रंजन समूह 

श्री शिवराज्याभिषेक दिनी किल्ले सिंहगडावर पालखी सोहळा

श्री शिवराज्याभिषेक दिनी किल्ले सिंहगडावर पालखी सोहळा विश्व हिंदू परिषद पुणे श्री शिवराज्याभिषेक अभिवादन समिती (किल्ले सिंहगड) तर्फे आयोजन  ...